परूळेकरांना पत्र

प्रवीण यांनी परूळेकरांना ई-पत्र पाठविल्याचे वाचले आणि वाटले म्हणून मी ही परूळेकरांना एक पत्र धाडले. प्रवीण धन्यवाद…

नमस्कार परूळेकर साहेब,

आपला लोकप्रभा या साप्ताहिकात “अल्केमिस्ट्री” या सदराखाली प्रसिद्ध झालेला “सचिन (ग्लॅडीएटर) तेंडुलकर” हा लेख वाचला. आपण आपल्या लेखात उगाच सचिन तेंडुलकर ला गोवले आहे असे माझे आणि माझ्या सारख्याबर्‍याच जणांचे मत आहे. या बाबतच्या ईमेल्सनी आपला मेल बॉक्स नक्कीच भरून गेला असेल. या संबंधी मराठी जनांची मते आपणास www.marathiblogs.net या संकेतस्थळावर वाचावयास मिळतील. याच संकेतस्थळावर माझ्या ब्लॉग वरील पोस्ट ही वाचावयास मिळेल. पण आपल्या सोयी साठी मी हा पत्रप्रपंच करीत आहे. आम्हा मराठी जनांचे असे प्रांजळ मत आहे की सद्द्या सगळे जण म्हणजे राजकारणी, पत्रकार, परप्रांतिय इ. मराठी माणसाला गृहीत धरताहेत आणि त्यांना वाटेल तशी मते व्यक्त करताहेत.

मराठी भाषेची चिंता आम्हालाही आहे. पण त्यासाठी आज महाराष्ट्रात चाललेला आक्रास्तळेपणा… “being aggressive does not mean that you have to be offending”. प्रा. मनोहर राईलकरांनी व्यक्त केलेली बालहक्काची चिंता आणि सुचविलेले मार्ग महाराष्ट्राला मराठी राज्य बनविण्याचा एक सुकर मार्ग आहे. पण त्या साठी लागणार लोकजागृती… त्या साठी द्यावा लागणार वेळ… आयुष्य खर्ची घालावे लागणार… इतका वेळ बाबा आमटे, प्रकाश आमटे या लोकांकडे आहे. पण आज महाराष्ट्राच्या राजकारणात इतका वेळ आहे कोणाकडे? आज मनसे अथवा शिवसेनेने त्यांच्याकडे असलेली युवा शक्ती विधायक कामांमधे वापरल्यास येणार्‍या काही वर्षातील महाराष्ट्र वेगळा असेल. anyway… हे झाले विषयांतर… आपल्या लेखावरील प्रतिक्रिया खाली देत आहे.. त्यातील एक महत्वाचे वाक्य मुद्दाम अधोरेखित केले आहे…

की तुमचा हेतू काहीही असला तरी हा लेख सवंग लोकप्रियतेच्या मार्गानेच जाणारा आहे.

राजू परूळेकर, सचिन तेंडुलकर आणि मराठी माणूस

राजू परूळेकर यांच्या कारकिर्दीला वीस वर्ष पूर्ण झाली!! राजू परूळेकर कोण? अहो तुम्हाला माहीत नाही का? असे कसे हो तुम्ही! तुम्हाला राजू परूळेकर माहीत नाहीत… अहो ते एक नावाजलेले पत्रकार आहेत. लोकप्रभा या साप्ताहिकात त्यांनी “अल्‍केमिस्ट्री” या सदराखाली “सचिन (ग्लॅडीएटर) तेंडुलकर” असा लेख लिहीला आहे… आणि त्यात त्यांची मते त्यांनी मनमुराद व्यक्त केली आहेत. भारतात लोकशाही आहे… प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे… भाषण स्वातंत्र्य आहे.. आणि त्यातून हे पत्रकार म्हणजे काय “माकडाच्या हातात कोलीत”… येथे परूळेकरांना माकड म्हणण्याचा अजिबात अट्टाहास नाहीये.. पण मायबोलीत अशीच म्हण आहे त्याला मी बापूडा काय करणार. तर असो.

या लेखात परूळेकरांनी सवंग लोकप्रियतेच्या मागे लागलेल्या माध्यमांची आणि इतर मंडंळीची मनसोक्त खिल्ली उडविली आहे. पण परूळेकरांनी लिहिलेला लेख हा काहिसा विचार करायला लावणारा असला तरी लेखाची एकंदर मांडणी ही सवंग लोकप्रियतेच्या मार्गानेच जाणारी आहे. सवंग लोकप्रियतेचे दोन मार्ग असतात, पहिला म्हणजे सध्या ज्या गोष्टींची चलती आहे त्या प्रवाहात सामिल होणे आणि दुसरा म्हणजे त्याच गोष्टी विषयी अगदी विरूद्ध मत व्यक्त करून सेन्सशन निर्माण करणे. परूळेकरांचा लेख हा दुसर्‍या प्रकारात मोडतो. (कदाचित त्यांचा हेतू तसा नसेलही पण लेख तरी तसाच आहे.)

क्रिकेट (पक्षी कुठलाही खेळ असो) आणि रोमन राज्यक्रांती या दोहोंमधील तुलना, त्यातुन त्यांनी सचिनची ग्लॅडीएटर म्हणून केलेली संभावना अत्यंत आक्रास्तळेपणाची वाटते. याच आक्रास्तळेपणाचे एक उदाहरण खाली दिले आहे

“जगात आनंद मिळवाव्या अशा गोष्टी निसर्गातच भरपूर आहेत. एखादा शेतकरी शेती करताना पाहताना मला सचिनच्या बॅटिंगचा साफ विसर पडतो किंवा साधं जंगलातून चालत जाताना गच्च भरलेलं मधाचं पोळं पाहताना मला ‘क्रिकेट’ ही गोष्ट ‘पीएसपी’, ‘गेम बॉय’ वगैरेसारखी सिंथेटिक आणि खोटी वाटते. तशी ती आहेच. ‘ऑरगॅनिक’ (नैसर्गिक) गोष्टींचा आनंद उधळायला माणसात अभिजातता लागते. सचिन किंवा कोणताही क्रिकेटर ही एक व्हच्र्युअल रिअॅलिटी आहे. एक प्रकारचं टेक्नॉलॉजिकल मॉर्फिन किंवा अफू!

खेळ, मग कुठलाही असो, तो खेळला जाण्यामागे अनेक कारणे असू शकतात. आणि तो तुम्हाला सिंथेटीक वाटत असेल म्हणून तो तसाच आहे हे जाहीर करण्याचे स्वातंत्र्य परूळेकरांना कोणी दिले. बरं ज्यांना क्रिकेट हा खेळ आवडतो त्यांच्याकडे अभिजातता नाही हे ठरविणारे परूळेकर कोण?

क्रिकेट या खेळाला आपल्याकडे अवास्तव महत्व दिले जाते आणि त्यामुळे इतर खेळांकडे प्रसंगी मुद्द्यांकडे दुर्लक्ष होते ही गोष्ट मान्य आहे. पण त्याला लोंकाची मानसिकता जबाबदार आहे. खेळ अथवा खेळाडू नव्हेत. आज शरद पवार किंवा नरेंद्र मोदी या सारखी माणसं क्रिकेटशी संबंध का जोडून आहेत या प्रश्नाची अनेक उत्तरे असू शकतील. पण म्हणून सचिन तेंडुलकरचा ग्लॅडीएटर म्हणून वापर करून किंवा त्याला हिरो बनवून पवार किंवा इतर मंडळी जनतेला त्यांच्या प्रश्नाचा विसर पाडतात हे विधान अत्यंत बालिशपणाचे वाटते.

राजू परूळेकरांनी स्वतःच्या सामाजिक जाणिवा मांडल्या आहेत… “सचिन तेंडुलकरविषयी मला कोणतीच भवना नाही. ना प्रेम, ना आदर, ना तिरस्कार, ना द्वेष, ना खंत, ना खेद. तो आपली नव्या संस्कृतीतली तलवारबाजी करून रग्गड पैसे कमवतो आहे. पण त्याला वापरून, आपल्या दैनंदिन जीवनात ज्यांनी दु:ख, दैन्य आणि हताशता निर्माण केली आहे ते त्याचा आपल्याला विसर पाडू इच्छितात याचा मला त्वेष आहे. कोणत्याही काळातल्या कोणत्याही विचारवंताला, लेखकाला तो असतोच.” त्यांच्या सामाजिक जाणिवांबद्दल काहीही मत व्यक्त करण्याचा अधिकार मला नाही. पण त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर लिहिलेला लेख (“अल्‍केमिस्ट्री” याच सदरात), त्यांनी उद्धव ठाकरे यांची (अशाच भाषेत) उडविलेली खिल्ली अथवा संजय राऊत यांच्या विषयी लिहिलेला लेख हे काही विचारवंताचे लेख अशा सदरात मोडत नाहीत. जर क्रिकेट हा खेळ बघून अथवा खेळून जर मराठी माणसाचे नुकसान होत असेल तर परूळेकरांचे व्यक्ती दोषांवर आधारित लेख वाचून समस्त मराठी जनांचे कोणते कल्याण झाले आहे ते परूळेकरांनी समस्त मराठी जनतेला विशद करावे अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे.

तरी ही परूळेकर साहेब जर तुम्हाला सवंग लोकप्रियतेचा तिटकाराच असेल (तो आम्हा वाचकांनाही आहे) तर तुम्हाला जो मुद्दा मांडायचा असेल तो सरळ मांडा. उगाच लोकांच्या व्यक्तीगत आयुष्यात हात घालून (ज्याला “अंडर द बेल्ट” असे म्हटले जाते) किंवा आक्रास्तळेपणे मतं व्यक्त करून सेन्सेशन निर्माण करण्यात काय हशील?

तुम्हाला “सचिन मराठी असून इंग्रजीतून बोलतो” याचा राग आहे का? “सचिन म्हणाला मुंबई सगळ्यांची आहे” हे तुम्हाला पटले नाही का? आणि म्हणूनच तुम्ही शेवटच्या परिच्छेदामधे सचिन आणि गांगूली यांची तुलना करून गांगूली हा श्रेष्ठ ग्लॅडीएटर आहे असे तात्पर्य काढले आहे का?

“ग्लॅडिएटर म्हणूनही गांगुली आणि सचिन यात गांगुली श्रेष्ठ आहे. कारण तो जाणीवपूर्वक बंगाली माध्यमं व माध्यम प्रतिनिधींना अत्यंत जवळ ठेवतो. स्थानिक बंगाली चॅनल्स व भाषेतच जास्त करून बोलतो आणि शेवटी अकरा काय किंवा अकरा कोटी काय त्यांचा नेता बनणं हे मोठय़ा ग्लॅडिएरचं काम आहे. ते गांगुलीने यशस्वीपणे केलंय. सचिन कर्णधार म्हणून साफ आपटला. त्याचं स्मरण आपल्याला आहे का? की आपण मात्र तो मराठी म्हणून त्याचं हे सर्वात मोठं वैगुण्य लपवायचं?”

हे लिहिताना आम्ही मराठी आहोत आणि आम्ही आमच्या माणसांची वैगुण्य (म्हणजे आम्हाला वाटतील ती!!) वेशीवर टांगणार हा मराठी बाणा सोडलेला नाही.

देवा माझ्या शेजार्‍याला सुखी ठेव!!

सिंगापूरला आल्या पासून सगळ्यात जास्त उणीव जर कुठल्या गोष्टीची भासत असेल तर ती म्हणजे शेजार्‍यांची… बालपण मुंबईच्या चाळीत गेल्यामुळे नेहमीच ओपन डोअर पॉलिसिची सवय असणारा मी… चाळीतील सगळ्या लहान मोठ्यांचा एकमेकांच्या घरी सदैव मुक्त संचार असायचा… बरेचदा सगळे बालगोपाळ आज यांच्या घरी जेवायला तर उद्या त्यांच्या घरी… दिवाळीच्या फराळाचे (म्हणजे फराळ बनविण्याचेही आणि खाण्याचेही) वेळापत्रक ही सगळ्यांचे मिळून बनायचे…

त्या दिवसांमधे आईच्या तोंडी ऐकलेले हे वाक्य… “देवा माझ्या शेजार्‍याला सुखी ठेव!!” का विचारावे तर आई म्हणायची “अरे तुझा शेजारी सुखी असेल तरच तो तुझ्या अडीनडीला कामी येईल ना… तोच जर त्याच्या व्यापात गुंतलेला असेल तर तो तुला कशी मदत करेल…” आताच्या स्वयंसिद्धतेच्या जगात कदाचित हा विचार मागासलेपणाचा वाटेल… पण आईचा मात्र तो दुसर्‍याचे सुख चिंतण्याचा एक प्रॅक्टीकल अप्रोच होता असे मला आजही वाटते. असो… आजचा विषय आहे शेजारी…

आमच्या चाळीत (म्हणजे सोसायटी ९२ घरांची असली तरीही) ५ घरं होती. त्यापैकी एक यु.पी. चे होते आणि त्यातील बरेच जण (म्हणजे त्या एका घरात २० एक जण रहात) “एक थाली और एक कटोरी” असे रहाणारे होते… त्यामुळे त्यांना वगळता इतर चार घरांचे मिळून एक कुटुंब होते. त्यामुळे नवीन कपडे आणले की चाळीत सगळ्यांना दाखवायचे, सगळ्या मोठ्यांच्या पाया पडायचे असे रिवाज असायचे. ह्या चाळीत रहायला येण्यापुर्वी आम्ही जेथे रहात होतो तेथील शेजार्‍यांशी देखील आई बाबांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. अशा वातावरणात बालपण गेल्यामुळे शेजार्‍याच्या सुखाची प्रार्थना आपसूकच होत असे.

नोकरीच्या निमित्ताने पुण्याला गेलो तेव्हां पहिल्यांदा फ्लॅट सिस्टीमशी (क्लोज्ड् डोअर सिस्टीमशी) संबंध आला… दिवसभर बंद असणारे दरवाजे आणि जाता येता जिन्यात भेटले तर एक प्लॉस्टिक स्माईल देणारे शेजारी(?) भेटले. (पुणेकर हो… हे वाक्य येथे मला आलेल्या अनुभवाशी संबंधीत असून याचा अर्थ पुणेकर शेजारी असे असतात किंवा मुंबईकर शेजारी असे नसतात असा होत नाही…) पुण्यातील ४ वर्षाच्या वास्तव्यात आम्हाला फारसे काही शेजारी जोडता आले नाहीत… कदाचित फ्लॅट मधे रहाणारे लोकही तीच प्रार्थना करत असतील, “देवा माझ्या शेजार्‍याला सुखी ठेव…” (जेणे करून तो माझ्याकडे मदत मागायला येणार नाही आणि उगाच माझ्या डोक्याला ताप देणार नाही!!)

या सगळ्याला कंटाळून शेवटी आई बाबा पुन्हा मुंबईला आले. कालांतराने मुंबईला मोठे घर घ्यायचे ठरले तेंव्हा आई बाबांची पहीली अट… “घर परळ – दादर – लालबाग मधेच घ्यायचे. आमचा जोडलेला शेजार आहे तो सोडून आम्ही इतरत्र जाणार नाही…” आमच्या नवीन सोसायटी मधे तसे बरेच जण चाळीतुनच फ्लॅटमधे प्रमोशन झालेले आहेत त्यामुळे कि काय अजूनही बर्‍यापैकी ओपन डोअर सिस्टीमच आहे.. त्यामुळे आई बाबांचे सध्या बरे चालले आहे…

पण सिंहपूरीत शेजारी औषधाला देखील सापडत नाही. आम्ही आधी रहात होतो तो “कोंडोमिनिअम” पंचवीसेक वर्ष जुना आहे आणि आमच्या मजल्यावरील इतर पाच फ्लॅट मधे राहणारे रहिवासी वीस वर्षापेक्षा जास्त काळ तेथे रहात होते पण त्यांना एकमेकांचे नाव देखील ठाऊक न्हवते. आता जर शेजार्‍याचे नाव देखील ठाऊक नसेल तर तो जगो अथवा मरो… कोणाला त्याचे काहीही सुखदु:ख नाही… आमच्या सध्याच्या शेजार्‍यांचीही कहाणी काही वेगळी नाही… प्रत्येक जण आपापल्या ठरलेल्या चाकोरीत झापडं लाऊन निमुटपणे जगत असतो आणि म्हणतो “देवा मला सुखी ठेव जेणे करून मला कोणाची गरज पडणार नाही!!”

पण मित्रहो असे असले तरी आता पुन्हा एकदा शेजारधर्माची चलती आहे… का ते विचारा… अहो “फार्मविलं” मुळे… खर्‍याखु‍र्‍या जगात एकमेकांपासून मैलोंमैल लांब असलो तरी “अरे / अगं मला फार्मविलं वर नेबर म्हणून ऍड कर” म्हणून सगळे एकमेकांना रिक्वेस्ट पाठवत असतात… पुर्वी चाळीत एकमेकांना शेजारपाळं दिलं जायच तशी गिफ्ट्स्ची देवाण-घेवाण सदैव चालू असते… एकमेकांच्या शेतात जाऊन पाचोळा साफ कर, कावळ्यांना हाकलून लाव, तणं काढून दे असली कष्टाची कामंही लोक अगदी हौशीने करताना आढळतात. सध्या फार्मविलंवाले दुसर्‍याच्या शेतात ५ वाफ्यांना खतं घालायचं कामही करायला लावतात. चला या निमित्ताने परत एकदा जालावर (इंटरनेटवर) का होईना पण शेजारधर्म वाढिला लागला आहे. आणि लोक परत एकदा “देवा माझ्या (फार्मविलं वरच्या) शेजार्‍याला सुखी ठेव!! (जेणे करून तो वरच्या लेवलला जाऊन मला चांगली गिफ्ट्स् पाठवू शकेल)” अशी प्रार्थना करू लागले आहेत…

देवा फार्मविलं वाल्याना सुखी ठेव!!

पालकांनी चालवलेला बालकांचा छळवाद

नमस्कार मंडळी,

आज सकाळीच (हा लेख वाचण्यापुर्वी) सुप्रदाशी बोलताना नेमका हाच चर्चेचा विषय होता. शिक्षण आणि शिक्षणाचे माध्यम… भारतातच न्हवे तर आशियायी देशांमधे “इंग्रजी न येण” हे न्युनगंड लोकांच्या मानगुटीवर बसलेले आहे. मागच्या काही पिढ्यांमधे इंग्रजीच्या बाबतीत असलेली अंधश्रद्धा आणि त्याच मुशीतून घडलेली आजची पिढी येणा‍र्‍या पिढ्यांकडून त्यांच्या हक्काची मातृभाषा त्यांच्या पासून हिरावून घेणार आहे. मागणी तसा पुरवठा या तत्वानुसार आज इंग्रजी माध्यमाच्या शाळांना धडाधड परवानगी मिळत आहे आणि मातृभाषेतील शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. आज गरज आहे ती मागणी बदलण्याची… लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत प्रकाशित झालेला प्राध्यापक मनोहर राईलकरांनी लिहिलेला हा अभ्यासपूर्ण लेख आणि त्यात विस्तृत केलेली मानसिकता हा खरचं चिंतनाचा विषय आहे…

आपल्याला हा लेख आवडल्यास जमेल तितक्या पालकांना हा लेख पाठवा. वाचणार्‍यांच्या मनात आज एक कंपन जरी निर्माण झाले तरी उद्या त्याची लाट व्हायला वेळ लागणार नाही.

आपला,

सुधीर निखार्गे

पालकांनी चालवलेला बालकांचा छळवाद
लोकसत्ता, शनिवार, ७ नोव्हेंबर २००९
प्रश्न. मनोहर राईलकर
प्रश्न. राईलकर हे पुण्याच्या स. प. महाविद्यालयात ३४ र्वष गणिताचे प्रश्नध्यापक होते. त्यांनी उपप्रश्नचार्यपद, तसेच नू. म. वि. मराठी शाळेचे प्रमुखपदही भूषवलं आहे. ‘बालकांचे अधिकार’ या विषयावर त्यांनी सखोल अभ्यासांती विस्तृत लेखन केलेलं आहे. त्याचाच हा सारांश. बालकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणं, फार लवकर बालवाडीत डांबणं, दोन-तीन वर्षाच्या बालकांना लिहायला लावणं, पाच-दहा वर्षाच्या बालकांना अभ्यासाच्या ओझ्याखाली दडपून मैदानी खेळांपासून वंचित ठेवणं, इत्यादी नाना प्रकारे आपल्याच बालकांचा छळ करणाऱ्या व करू इच्छिणाऱ्या आई-वडिलांना त्यांनी हे लेखन अत्यंत खेदानं अर्पण केलं आहे. पुढील आठवडय़ात ‘बालदिन’ आहे. शिशु-शाळांमध्ये प्रवेशाचा मोसम सुरू झाला आहे. या पाश्र्वभूमीवर हा लेख गांभीर्याने वाचला जावा आणि त्यावर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा आहे.

केंद्र सरकारनं नुकताच बालकांचा अधिकार मान्य करणारा अधिनियम (कायदा) संमत केला आणि कित्येक र्वष रखडलेल्या या कायद्यावर एकदाचं शिक्कामोर्बत झालं. विधेयक संमत झालं खरं, पण सरकारनं हे काम फारच अपुरं वा अर्धवटच केलेलं आहे. सहा ते चौदा वर्षाच्या बालकाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, हे योग्यच आहे. पण बालकांचे अधिकार हा इतका छोटा आणि संकुचित स्वरूपाचा विषय नसून, बालकांचे आणखी कित्येक अधिकार असे आहेत- ज्याचं गांभीर्य कुणालाच कसं उमगत नाही, याचं नवल वाटतं.

देशात ६ ते १४ या वयोगटातील सुमारे दहा कोटी मुलं आहेत. त्यातील चौथा हिस्सा मुलं आर्थिक आणि सामाजिकदृष्टय़ा मागास वर्गात मोडतात. राष्ट्रीय ज्ञान आयोगाच्या उपाध्यक्षा पुष्पा भार्गव यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून हा अधिनियम संमत करण्याची घाई न करण्याची सूचना केली आहे. ‘कमी दर्जाच्या खासगी शाळांना आर्थिक साह्य देण्याऐवजी स्वत:च्या शाळा सुधारण्याकडे सरकारनं अधिक ध्यान द्यावं,’ असं त्यांचं म्हणणं आहे. पण ‘राज्यावर आल्यापासून अवघ्या १०० दिवसांत आम्ही काय करतो पाहा,’ हे दाखविण्याच्या नादात घाईघाईनं सरकारनं हा अधिनियम संमत करून घेतलासुद्धा. ‘घाईनं’ असं म्हणण्याचं कारण की, प्रत्यक्षात या अधिनियमाला भरीव रूप देण्यासाठी निदान २०,००० (एवढय़ा तरी पुरतील का?) तरी प्रश्नथमिक शाळा नव्यानं निर्माण करायला हव्यात, हे कुणाच्या लक्षात आलं आहे की नाही, याची शंकाच आहे. (या कायद्यात अनेक त्रुटी आहेत. त्यावर सध्या चर्चा चालू आहेच.)

भारताला अजूनही १५०० विद्यापीठांची गरज आहे, असं ज्ञान आयोगाचे अध्यक्ष म्हणतात. एका विद्यापीठाला प्रतिवर्षी १०० कोटी रु. लागत असतील तर १५०० विद्यापीठांना किती निधी लागेल? इतका पैसा जर उच्च शिक्षणासाठी उपलब्ध होत असेल तर मग पायाभूत बालशिक्षणाकरिता तो का मिळू नये?

मुलांचा मातृभाषेतून शिकण्याचा अधिकार अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचा साधा उल्लेखही या कायद्यात नाही. त्याबाबतीत पालकांना कुणीच नेमकं समजावून सांगत नसल्यानं आपापल्या अंधश्रद्धांनुसार पालक धावत आहेत आणि बालकांनाही धावडवत आहेत. मातृभाषेतून शिक्षण हा बालकांचा नैसर्गिक अधिकार आहे, या मूलभूत वास्तवाचीच कल्पना आपल्याला नाही. आपल्या समाजात आज इंग्रजीच्या तुलनेत मराठीला गौण स्थान आहे, हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे. मराठी माध्यमाच्या नव्या शाळांना सध्या राज्य शासन परवानगी देत नाही. मराठी शाळांबाबत सरकारची अनास्था आणि शेकडो इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढण्यातला उत्साह यापेक्षा वेगळं काही सुचवीत नाही.

पालकांना कुणी प्रश्नंजळपणे मातृभाषेतून शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगायचा प्रयत्न केला तरीही इंग्रजी माध्यमातून शिकल्याशिवाय आपल्या मुलाला भवितव्य नाही, अशी एक ठाम समजूत समाजाने करून घेतली आहे. आणि या भीतीग्रस्त समजुतीच्या बाहेर यायचा विचारसुद्धा कुणी करत नाहीत. मात्र, आपल्या या अंधश्रद्धेमुळं बालकांची कुतरओढ होते, हे कुणाला कळत तर नाहीच; पण याची पुसटशीही जाण संबंधितांना नसावी याचा खेद होतो. परक्या भाषेतून विषय ग्रहण करणं मुळीच सोपं नसतं. मूलभूत संकल्पना समजण्याकरिता मातृभाषेशिवाय कोणतंही माध्यम उपयोगी नाही, असं मत सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलंय. जगातल्या सगळ्या शिक्षणतज्ज्ञांचंही हेच मत आहे.

खरोखरीच पालकांना आपल्या मुलांचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर त्यांनी मुलांना मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळेतच घालायला हवं. पण तसं ते करीत नाहीत. याचा अर्थ ते बालकांच्या नैसर्गिक अधिकारावर आक्रमण करतात. आणि तसं त्यांना करू देणारं, किंबहुना करायला भाग पाडणारं सरकार आणि तथाकथित शिक्षणतज्ज्ञ या गुन्ह्यात सहभागी होत आहेत. बालकं ही राष्ट्राची संपत्ती असेल, तर हा अधिकार बालकांना असायलाच हवा.

शिक्षितांच्या मुलांच्या शिक्षणाबद्दलच्या या अंधश्रद्धेचा कुटिल लाभ उठवून आपली तुंबडी भरण्याचा प्रयत्न काही शैक्षणिक संस्था करीत आहेत. कारण शिक्षण देणं हा आता व्यवसाय झालेला असल्यानं ‘मागणी-पुरवठा’ न्यायानं मागणी वाढली की दर वाढणं, या व्यवसायजन्य अलिखित न्यायानं शुल्कवाढ होणारच. नफा मिळवणं हेच तर कोणत्याही व्यवसायाचं मुख्य उद्दिष्ट असतं. त्यामुळं खासगी शाळांनी फी वाढवून तुमची पिळवणूक केली तरी तुम्हाला ती सहन करायला हवी.

इंग्रजी माध्यमाशिवाय पर्याय नाही, ही भावना निर्माण करणारे सु(?)शिक्षित पालक समाजद्रोह करीत आहेत. ज्यांना ते परवडत नाही, असे पालकसुद्धा पोटाला चिमटा घेऊन केवळ अपत्यप्रेमापोटी ही घातक गोष्ट करू पाहतात. बाळ आजारी पडल्यावर जाणकार वैद्य वा डॉक्टरकडे नेण्याऐवजी अंधश्रद्ध खेडूत अंगारेधुपारे करतो, त्यापेक्षा यात वेगळं ते काय आहे?

हे थांबवण्याकरिता खरं तर अधिनियम करायला हवा. अगदी तातडीनं! कर्नाटक सरकार तो करू पाहत आहे, तर तिथे शिक्षित पालक त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेत आहेत. पण त्यांना सर्वोच्च न्यायालयाचा आधार मिळू शकत नाही. महाराष्ट्र सरकारमधील काही मंत्र्यांचाच इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालविण्याचा व्यवसाय असल्यानं सरकारला मातृभाषेतून शिक्षणाचा कायदा करण्याचा मार्ग सोयीचा वाटत नाही. एकूण काय, तर- मातृभाषेतूनच शिक्षण घेण्याचा बालकांचा अधिकार कुणीच उचलून धरू इच्छित नाही!

विद्यार्थ्यांच्या शारीरिक- मानसिक छळवादापेक्षाही अधिक गंभीर असा हा छळाचा रोग मोठय़ा प्रमाणावर समाजात बोकाळतो आहे. शहरांप्रमाणंच लहान गावांतही कर्करोगाप्रमाणं तो वेगानं पसरत आहे. याची काळजी कुणाला नाहीच. उलट, सर्व समाज मोठय़ा आनंदानं या रोगाचं स्वागत करीत आहे. या भयानक रोगाला वेळीच आळा घालायला हवा होता. महात्मा गांधींनी १९२१ सालीच तसं सुचवलंही होतं. त्याआधी १९१७ च्या सुमारास रवींद्रनाथ टागोरांनीही अत्यंत परखडपणं हे सांगितलं होतं.

स्वातंत्र्य मिळालं आणि आपल्याला या गोष्टीचा विसर पडला. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षणाचा मुलांचा नैसर्गिक अधिकार हिरावून घेऊन त्यांचा छळ चालू आहे. पालकांच्या अट्टहासामुळे धंदेवाईक संस्थाचालक त्यांना लुबाडत आहेत. बालकाला इंग्रजी माध्यमात शिकवणं यात पालकांना आज प्रतिष्ठा वाटते. पण याचे दुष्परिणाम दीर्घकालीन व शाश्वत असतील. म्हणूनच समाजाने त्वरित डोळे उघडले पाहिजेत.

महात्मा गांधी आणि रवींद्रनाथांप्रमाणे अनेक शिक्षणतज्ज्ञांनी, तसेच निरनिराळ्या आयोगांनी वेळोवेळी अशा सूचना केलेल्या आहेत. पण त्या सूचनांकडे समाज पूर्णपणे दुर्लक्ष करून आपल्या अंधश्रद्धेनुसार- महणजेच मेषसिद्धांतानुसार (एक मेंढरू खड्डय़ात पडल्यावर पाठोपाठ त्या खड्डय़ात उडय़ा घेणाऱ्या अन्य मेंढरांप्रमाणे!) अधिकाधिक पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घालून त्यांचा छळ करीत आहेत. स्पष्टच बोलायचं तर- कोठारी आयोगाचा, महात्मा गांधींच्या योजनेचा अगदी बट्टय़ाबोळ झालाय. आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून ६२ र्वष झाली तरी बालकांचं भाषामाध्यम काय असावं, या मूलभूत प्रश्नातूनच आपण अजून बाहेर पडू शकलेलो नाही! खरं तर भाषामाध्यम काय असावं, हा प्रश्नच कसा असू शकतो? जगात तर तो कुणालाही पडलेला नाही. प्रत्येक देश आपली स्वत:चीच भाषा शिक्षणाचे माध्यम म्हणून वापरतो.

मात्र, आपल्या महाराष्ट्र शासनाने इंग्रजी माध्यमाच्या हजारो शाळा काढण्याच्या योजना मंजूर केल्याने आपण याच्या अगदी उलट दिशेनं प्रवास सुरू केला आहे. मराठी लेखक, कोशकार डॉ. रघुवीर, कोठारी आयोग, राष्ट्रीय एकात्मता मंडळ, भावनिक एकात्मता समिती, अधिकृत भाषा आयोग, महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ या सर्व सरकारनंच स्थापन केलेल्या संस्थांचे श्रम आणि अमाप द्रव्य त्यामुळे पाण्यात गेले आहेत. यामुळं राष्ट्रीय संपत्तीचाच नाश झाला नाही का? जनतेचाच पैसा यात वाया जात असल्यानं सरकारला त्याचं काही वाटत नाही, हे उघड गुपित आहे.
‘मातृभाषेतून शिक्षण’ ही कल्पना अगदी शेवटपर्यंत- म्हणजे मायबोलीपर्यंत नेणं आवश्यक आहे. हळूहळू म्हणजे चौथी-पाचवीच्या पुढं मुलांना प्रमाण मराठी भाषेकडे आणण्याचा प्रयत्न करणं शैक्षणिकदृष्टय़ा इष्ट ठरेल, असं मला ठामपणे वाटतं. जर प्रमाण समजली जाणारी पुण्या-मुंबईची भाषाही ठिकठिकाणच्या बालकांना जड जात असेल तर मग आपल्या भाषेशी दुरान्वयानंही संबंध नसलेल्या इंग्रजीसारख्या भाषेतून बालकांना ज्ञानग्रहण करायला लावणं हा त्यांच्यावर अत्याचारच नाही तर काय? तुम्ही स्वत:च्या भ्रामक कल्पनांमागे धावता आणि बालकांचे हाल करता, असं म्हटलं तर त्यात काय चुकलं?

१८६८ मध्ये जपाननं विज्ञानात झेप घ्यायचं ठरवलं. एकदा त्यांनी हे ठरवल्यावर त्यांना कुणीच रोखू शकलं नाही. जपाननं आपली मुलं युरोप आणि अमेरिकेत पाठवायला सुरुवात केली. तिथलं शिक्षण संपल्यावर त्यांना त्यांनी परत बोलावलं आणि ‘जे काय शिकला असाल ते सारं जपानीत लिहून काढा,’ असा आदेश दिला. त्याकरता लागणारी परिभाषा अर्थातच जपानीत नव्हती. म्हणजे तेवढय़ापुरती तरी ती सक्षम नव्हती! पण त्यांना पुढचा आदेश मिळाला- ‘शब्द घडवा. बरेवाईट, सोपे-बोजड.. कसेही; पण जपानीत आणि सर्व समाजाला कळतील असे.’ सुदैवाने तथाकथित ‘बोजड’ शब्दांचीसुद्धा आपल्यासारखी तिथं कुणी टिंगलटवाळी केली नाही. कुठलेही शब्द तसे मूलत: निर्थकच असतात; वापरण्यानंच त्यांना अर्थ चिकटतो. त्यांच्या सुदैवानं ‘जपानी भाषा विज्ञानासाठी सक्षम नाही,’ असं म्हणणारा कुणी पंडित जपानमध्ये नव्हता. आणि असता, तरी त्यांनी त्याला जुमानलं नसतं, किंवा कदाचित तोच असले उद्गार काढायला धजावला नसावा.

सर्व विज्ञान सर्वसामान्य माणसाला कळणाऱ्या अशा जपानी भाषेत असण्याचे अनेक फायदे झाले. जेव्हा मातृभाषेच्या प्रवाहातून विज्ञान सामान्य माणसाच्या आटोक्यात येतं तेव्हाच तो समाज खऱ्या अर्थानं विज्ञाननिष्ठ होऊ शकतो. दुसऱ्या महायुद्धातील अपमानास्पद नामुष्कीनंतरही जपानने झेप घेतली ती त्यामुळेच.

तेव्हा एक महत्त्वाचा प्रश्न असा की, आपल्या समाजात वैज्ञानिक दृष्टीचा अभाव आहे, याला जबाबदार कोण? समाजाच्या भाषेत विज्ञान आल्याशिवाय वैज्ञानिक दृष्टी कशी येईल, हे आपल्या का लक्षात येऊ नये?

राष्ट्रीय एकात्मतेकरिता अगदी तळापासून ते थेट वपर्यंतच्या शिक्षणाचे माध्यम म्हणून मातृभाषेचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. भावनात्मक एकात्मतेकरताही तळापासून सर्वोच्च पातळीपर्यंत प्रश्नदेशिक भाषांचाच अवलंब शिक्षणाचे माध्यम म्हणून करणं निर्विवादपणं महत्त्वाचं आहे, असं भावनात्मक एकात्मता समितीचं मत आहे. याला राष्ट्रीय एकात्मता मंडळाचाही पाठिंबा आहे.

या संबंधातील अहवालाच्या अखेरीस सारांश मांडताना कोठारी आयोग म्हणतो, ‘प्रश्नदेशिक भाषांतून शिक्षण असण्यानं होणाऱ्या फायद्यांबद्दल आम्ही नि:शंक आहोत. देशाच्या सार्वत्रिक प्रगतीच्या दृष्टीनं टाकलेलं पाऊल म्हणून प्रश्नदेशिक भाषांचा विकास आम्हाला अत्यंत मह्त्त्वाचा वाटतो. शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीनं टाकलेलं ते एक महत्त्वाचं पाऊल आहे. मात्र, कोणताही गैरसमज होऊ नये म्हणून आम्ही एक बाब स्पष्ट करू इच्छितो. इंग्रजी किंवा इतर जागतिक भाषा हटवाव्यात असं आम्ही सुचवतो, असा याचा अर्थ नाही. आपलं शिक्षण प्रभावी आणि उपयुक्त होण्याला त्यांचा आपल्याला लाभच होईल.’ आयोगानं आणखी एक मुद्दा मांडला आहे. त्यांना इंग्रजीप्रमाणं इतरही परकीय भाषांचं महत्त्व वाटत होतं. ते म्हणतात- ‘राष्ट्रीय एकात्मता समितीनं जे म्हटले आहे, त्यावर आम्हीही भर देऊ इच्छितो. परिषदेच्या मते, जर विद्यापीठ पातळीवर प्रश्नदेशिक भाषांचा अवलंब शिक्षणाकरता केला नाही तर राष्ट्राची पीछेहाट होईल.’ यालाही ४७ र्वष झाली! म्हणजे राष्ट्राची पीछेहाट होण्याला विद्यापीठंच कारण आहेत!

कोठारी शिक्षण आयोगाच्या वृत्तांतातली ही अवतरणं अंधश्रद्धाळू पालकांचे डोळे उघडणारी ठरतील का?
‘परकीय भाषेतून शिकण्यामुळे विषयावर प्रभुत्व मिळवण्याऐवजी विद्यार्थी घोकंपट्टी करतात. शिवाय शाळांत आणि महाविद्यालयांत एकच भाषामाध्यम असण्यामुळं शिक्षणाला भक्कम आधार मिळू शकतो. आणि ज्या अर्थी आपण शालेय पातळीवर प्रश्नदेशिक भाषामाध्यमाचा अवलंब करण्याचा सुज्ञपणा दाखवला आहे, त्या अर्थी वाढत्या प्रमाणात महाविद्यालयीन पातळीवरही हेच धोरण अवलंबणं सुसंगत होईल. प्रश्नदेशिक भाषेतून घेतलेल्या शिक्षणामुळं त्यांच्या ज्ञानाचा आणि विचारशक्तीचा दर्जा निश्चितच उंच राहील आणि ज्ञानाच्या कक्षा विकसित करण्यासाठी संशोधनात्मक कार्याला ते फार मोठी प्रेरणा देऊ शकतील.’

कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदानप्रसंगी रवींद्रनाथ टागोरांनी केलेल्या भाषणातील उतारा आपले डोळे उघडणारा ठरावा. (कोठारी आयोगाला तो महत्त्वाचा वाटल्यानं त्यांनी तो उद्धृत केला आहे.) ‘शिक्षणाची भाषा आणि बालकाची भाषा यांच्यात फारकत केलेला जगात भारताशिवाय दुसरा देश नाही. पाश्चात्त्य ज्ञानाकडे वळल्याला जपानला पुरती शंभर वर्षेही लोटली नाहीत, पण शिक्षणाकरिता स्वदेशीवरच निर्भर राहायचे असा त्यांचा निर्धार होता. कारण असले शिक्षण त्यांना काही निवडक नागरिकांपुरते आणि शोभेची वस्तू म्हणून नको होते, तर सर्वच नागरिकांना समर्थ आणि सुसंस्कृत करण्यासाठी हवे होते. परिणामी पाश्चात्त्यांच्या शोषणप्रवृत्तीला सामोरं जाणं आणि जगात स्वत:साठी मानाचं स्थान उभारणं त्यांना शक्य झालं. म्हणून फारच थोडय़ांच्या आवाक्यात येऊ शकेल असे परकी भाषामाध्यम चालू ठेवण्याचा मूढपणा त्यांनी मुळीच केला नाही.’

गांधीजींनी ‘यंग इंडिया’मध्ये लिहिलेल्या पुढील लेखाकडेही मी वाचकांचं लक्ष वेधू इच्छितो- ‘परकीय माध्यमामुळे आपल्या बालकांच्या मेंदूला थकवा येतो. त्यामुळे त्यांच्या मज्जासंस्थेवर अनाठायी ताण येऊन ती फक्त घोकंपट्टी आणि पोपटपंची करू लागली आहेत. परिणामी मूलभूत आणि स्वतंत्र संशोधनाकरिता ती अपात्र बनली आहेत. त्यांच्या ज्ञानाचा कुटुंबाला अथवा समाजाला उपयोग होत नाही.’ गांधीजी इतक्यावर थांबत नाहीत. ते पुढं म्हणतात- ‘मी हुकूमशहा असतो तर परकीय माध्यमातून होणारं आपल्या बालकांचं शिक्षण थांबवलं असतं आणि मातृभाषेतून अध्यापन केलं नाही तर शिक्षक व प्रश्नध्यापक यांना सेवामुक्त करण्याची धमकी दिली असती. पाठय़पुस्तकं तयार होईपर्यंतसुद्धा मी थांबलो नसतो. बदलामागोमाग पुस्तकं तयार होऊ लागतील.’

गांधीजींचा वारसा सांगणारी आजची आपली सरकारं त्यांच्या तत्त्वांची पायमल्ली करीत आहेत, हे लक्षात यावं.
कर्नाटक सरकारनं कानडीतर शाळांतही कानडी भाषा अनिवार्य केली. त्याविरुद्ध तेथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी-पालक संघटनेनं दाखल केलेली याचिका फेटाळताना न्यायमूर्तीनी गांधींच्या उपरोल्लेखित मताचा उल्लेख तर केलाच आहे, पण स्वत:चंही मत मांडलं आहे. ते थोडक्यात असं : ‘जगातल्या सर्वच शिक्षणतज्ज्ञांच्या मते बालकांचं शिक्षण मातृभाषेतूनच व्हायला हवं. कोवळ्या बालकांना लहान वयात परकीय भाषेतून शिकायला लावणं हा क्रूरपणा आहे.’

माझा मोठा मुलगा लोणीकाळभोरजवळ राहतो. तिथं मराठी माध्यमाची एक शाळा आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या ध्वजवंदनासाठी मी त्या शाळेत गेलो होतो. तिथं मुलांच्या गळ्यात गळाबंद (टाय) पाहिले. कार्यक्रम संपल्यावर संचालकांना विचारलं, ‘गळाबंद का?’ त्यांचं उत्तर ऐकून मी सर्दच झालो. ते म्हणाले, ‘इंग्रजी शाळांबरोबर स्पर्धा करायची आहे ना!’

ब्रिटनमधलंच संशोधन सांगतं की, शाळेत नव्यानं प्रवेश करण्यापूर्वी मुलांत असलेल्या पददोषांचं प्रमाण शाळा सोडताना वाढलं असल्याचं दिसून आलं! त्याचं कारण चामडय़ाचे बूट असल्याचं दिसून आलं. पण आपल्या इंग्रजी शाळा त्यांचंच अंधानुकरण करीत नाहीत का? पालकांना हा छळ वाटत नाही. उष्ण प्रदेशात कापडी बूट का वापरले जाऊ नयेत? मुलांना बुटांचा त्रास होत असला तरी कुणाही पालकाची शाळेविरुद्ध ब्र काढायची प्रश्नज्ञा नाही. त्याबद्दल एका तरी पालकानं तक्रार केली आहे का? कारण पूर्वी ते इंग्रजांना दबून वागत होते, आता इंग्रजीला दबून वागत आहेत!
बालपण केव्हा संपतं, याबद्दल पालकांच्या कल्पना आणि तज्ज्ञांच्या कल्पना यांत महदंतर आहे. आपल्या मुलांना शक्य तितक्या लवकर शाळेत अडकवण्याची धडपड पालक करताना दिसतात. पण तज्ज्ञांचं म्हणणं पालकांच्या या बिनबुडाच्या समजुतीचा धुव्वा उडवणारं आहे.

पालकांनो, तज्ज्ञांनी संशोधन करून सांगितलेल्या माहितीचा उपयोग आपल्या बालकाच्या कल्याणाकरता करा. ‘फार लवकर शिक्षण सुरू करावं’ हा विचार शंकास्पद आहे. लवकर शाळेत घालण्याचे परिणाम टिकाऊ होत असल्याचा कोणताही सज्जड पुरावा नाही. सात वा आठ वर्षाची मुलं अधिक सक्षमतेनं, कमी श्रमांत शिकू शकतात आणि यशस्वी होतात. तत्त्वज्ञ मूर म्हणतात- बालकाला जन्मापासूनच प्रशिक्षण किंवा शिक्षण दिलं पाहिजे, हे बरोबर. पण ते वाचन, लेखन, अंकगणित असं औपचारिक शिक्षण नसून, मायेच्या उबेत आणि घरगुती वातावरणात सहजपणं आणि मुख्यत: मूल्यशिक्षण आणि मानसिक स्थैर्य देणारं असावं. उचित वेळेपूर्वी बालकांना शिक्षणाकरता उद्युक्त करणं हे मुळात अपूर्ण वाढलेली गुलाबाची सुंदर कळी जबरदस्तीनं उमलविण्यासारखं आहे. आपण कितीही नाजूक हातानं कळी उमलविण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला मिळणारं फूल निर्दोष असण्याचा संभव बहुधा कमीच.

मूर यांचं शाळाप्रवेशाच्या वयाबद्दलचं हे संशोधन पाहा : शाळेत लवकर प्रवेश केलेल्या आणि उशिरा प्रवेश केलेल्या मुलांचा तुलनात्मक अभ्यास केला तेव्हा उशिरा प्रवेश घेणारी मुलं अभ्यासातील प्रगती, जुळवून घेण्याची वृत्ती, नेतृत्वगुण, सामाजिक भावनेचा विकास अशा सगळ्याच बाबतीत लवकर प्रवेश घेणाऱ्या मुलांहून प्रकर्षानं अधिक विकसित असतात, असं दिसून आलं. मूर यांनी अनेक बालमानस-शास्त्रज्ञांच्या ८० च्या वर संशोधनपर निबंधांचा अभ्यास करून तयार केलेला हा प्रबंध त्यांनी दिलेल्या संदर्भासह शिक्षण क्षेत्रातल्या प्रत्येक व्यक्तीनं अगदी गंभीरपणं मनापासून अभ्यासावा असाच आहे. मूर यांच्या संशोधनानुसार, मुलांना आठ वर्षापर्यंत मूलभूत कौशल्यं आली पाहिजेत, हे आम्हाला पटत नाही. आकलनाच्या ज्या विषयांत सातत्यानं तार्किक विचार करण्याची गरज (उदाहरणार्थ- गणित, भाषेमधील व्याकरण इ.) पडते, त्या कामात मुलांना आठ वर्षापर्यंत गुंतवणं इष्ट नव्हे, हा त्यांच्या शास्त्रीय संशोधनाचा निष्कर्ष आहे.

एक समर्पक स्वानुभव नोंदवायला हवा. नेहमीप्रमाणं मी शाळेत चक्कर मारत असताना आमच्या शिशू-शाळेच्या एक शिक्षिका, ‘तुमच्या मुलाला अजून एक ते दहा अंकसुद्धा लिहिता येत नाहीत,’ अशी तंबीवजा सूचना पालकांना करीत असल्याचं माझ्या कानावर पडलं. ते ऐकून मी स्तंभितच झालो. नंतर त्यांना बोलावून घेऊन मी त्याबद्दल सूचना देत असताना त्यांचं उत्तर ऐकल्यावर माझीच वाचा बंद झाली. त्या म्हणाल्या, ‘साहेब, पालकांचीच मागणी असते. इतकंच नव्हे तर हे सारं शिकविण्याकरता खासगी शिकवणी वर्गसुद्धा चालतात.’ मी त्यांना विचारलं, ‘तुम्हीसुद्धा घेता का?’ त्यांचं उत्तर ऐकलंत तर थक्क व्हाल. काहीशा संकोचानं त्या म्हणाल्या, ‘पालकांचाच आग्रह असतो.’ स्वत:च्या अज्ञानाची मला कींव आली. पण हाही पालककृत छळाचा प्रकार आहे की नाही, ते तुम्हीच ठरवा.

प्रत्येक व्यक्तीच्या सर्व जीवनाचा कालबद्ध आखीव कार्यक्रम त्याच्या डीएनएवर नोंदलेला असतो. निरनिराळ्या कलाकौशल्यांकरता मूल कधी तयार व्हायचं, ते त्या संबंधित व्यक्तीच्याही हाती नसतं. आपण त्या तयारीला सिद्धता म्हणू. शिक्षण मानसशास्त्रात या सिद्धतेला इंग्रजीत readiness म्हणतात. वाचनसिद्धता (reading readiness), लेखनसिद्धता (writing readiness), इत्यादी. मात्र त्यापूर्वी म्हणजेच अकाली, वाचन, लेखन, गणिताकडे बालकाला वळविण्यामुळं त्याच्यात दृष्टिदोष, कर्णदोष, शिक्षणाबद्दलचा भयगंड, शाळेबद्दलचा तिटकारा निर्माण होतो.
बालकांना रॅगिंग करण्याचे असे प्रकार आज सुशिक्षित पालकवर्गाकडून अविचाराने होत आहेत. तथाफि त्यांनी असे प्रवाहपतित न होता, विचारप्रवृत्त होऊन, बालकपिढीला या छळवादाच्या विळख्यात अडकवून त्यांचे आणि पर्यायाने भावी समाजाचे नुकसान करू नये.

मराठी माझ्या घरी?

महाराष्ट्र मंडळ सिंगापूरच्या ऋतुगंध या द्वैमासिकाने आयोजित केलेल्या लेखन स्पर्धेसाठी लिहिलेला लेख:

“शब्दांचे अर्थ शब्दकोशात नाही सापडत… शब्दकोशात सापडतात ते “प्रतिशब्द”. शब्दांचे खरे अर्थ सापडतात ते जीवनात!!” हे वाक्य ऐकून कुतूहल चाळवले… १९८७ च्या न्यूजर्सी येथे झालेल्या मराठी संमेलनाच्या पुलंच्या अध्यक्षीय भाषणातील एक वाक्य. या भाषणात पु.ल. अचानक “बे एके बे… बे दुणे चार…” असा पाढा म्हणायला सुरवात करतात आणि जाणीव करून देतात की हा पाढा सगळ्या ऐकणार्‍यानां त्यांच्या गावात, त्यांच्या शाळेत, त्यांच्या वर्गात घेऊन गेला असेल.

आणि मनात विचार येतो अरेच्च्या… यांना कसं कळलं? कारण हे ऐकताना मी ही मनातल्या मनात पाढा पूर्ण केलेला असतो… मी ही माझ्या शाळेत त्या वर्गात… त्या बाकावर गेलेला असतो… माझा वर्ग, वर्गातील सगळी मुले, रांगांमधून फेर्‍या मारणार्‍या बाई… मग आठवते आई, छानसे कवर घातलेली अंकलिपी… सगळे सगळे डोळ्यासमोर तरळत असते… आहे की नाही गंमत?

आता सांगा… या सगळ्या संदर्भांशिवाय पाढे, अंकलिपी या शब्दांना काय अर्थ आहे? म्हणजे एक गोष्ट नक्की की संदर्भांमुळेच शब्दांना अर्थ येतो. आता हे जर आपण मान्य केले असेल तरच पुढचे वाचण्यात मजा आहे.

तर हे संदर्भ येतात कोठून? अगदी वेडगळ वाटेल प्रश्न पण तरीही मंडळी विचार करा… विचाराअंती लक्षात येईल की ह्या संदर्भांसाठी आवश्यक असतो संवाद… आई आणि मुलांमधील संवाद, भावंडामधील संवाद, परिवारातील संवाद, मित्रांमधील संवाद,समवयस्कांमधील संवाद… इतकेच काय तरी प्रत्येकाचा स्वतःशी चाललेला संवाद,निसर्गाशी चाललेला संवाद.. ह्या संवादातूनच आपल्याला हे संदर्भ सापडत असतात… ते संदर्भ त्या शब्दांच्या अर्थाला समृद्ध करीत असतात. म्हणजे आता असे बघा.. “लगोरी”ह्या शब्दाचा अर्थ काय? “गाढवपिशी” म्हटल्यावर तुमच्या काय लक्षात येते… “गोकर्ण” म्हटल्यावर तुम्हाला काय आठवते? ह्या प्रत्येक शब्दासाठी प्रत्येकाचा संदर्भ साधारण सारखाच असेल… आणि त्याने अर्थही एकच प्रतीत होतो.

आता हे ही लक्षात आले असेल की जिथे हे संदर्भ जुळतात त्या माणसांशी आपण कनेक्ट करू शकतो. आणि ह्या सगळ्या संदर्भांना कनेक्ट करते भाषा… आपला संवाद मराठीतून होतो, म्हणून आपले संदर्भ मराठी आहेत, आणि आपल्या सगळ्याचे संदर्भ मराठी आहेत म्हणून आपण एकमेकांशी कनेक्ट करू शकतो.

हा लेख अजून पर्यंत तरी गणित – भूमितीतील प्रमेय सिद्ध करण्याच्या प्रक्रियेने सुरू आहे. आणि जर “आपण सगळे का कनेक्टेड आहोत” हे प्रमेय जर सिद्ध झाले असेल तर “जे कनेक्टेड नाहियेत ते का नाहियेत” हे सांगायला कोण्या “रॅंग्लरची” (गणितज्ञाची) गरज नाहीये !

आता तुम्ही विचाराल “कोण कनेक्टेड नाहियेत?” आजची युवा पिढी… वय वर्षे २ ते १८… (म्हणजे बोलायला यायला लागल्या पासून बोलती बंद करायला लावणार्‍या वयातली पिढी) अनिवासी भारतीयांची युवा पिढी… ग्लोबलायझेशनच्या युगात जन्माला आलेली महानगरीय पिढी…ही मुलं मागील पिढीशी किंवा मागील पिढीला या पिढीशी, परदेशात जन्मलेल्या / वाढलेल्या मुलांना त्यांच्या भारतातील भावंडाशी, आजी आजोबांशी कनेक्ट करणं कठीण झालंय दिवसेंदिवस… कारण ह्या दोन पिढीतील भाषा वेगळ्या आहेत… त्यांचे संदर्भ वेगळे आहेत…

हल्ली मुलांना शाळेत सोपं जावं म्हणून आई वडील लहानपणापासून मुलांना इंग्रजी भाषेचे बाळकडू पाजतात. त्यांना सवय व्हावी म्हणून आई-वडील एकमेकांशीइंग्रजीमध्ये बोलतात. त्यांची बडबड गीतं, त्यांच्या गोष्टी हे सगळं इंग्रजी मध्ये… मग आल्या-गेल्या पाहुण्यांसमोर आपल्या लहानग्यांना इंग्रजी येतं ह्याचे कौतुक केले जाते.आणि इथपासूनच मुलांचे संदर्भ बदलू लागतात.

करिअरच्या मागे धावणार्‍या आजच्या कमावत्या पिढीला हे बदलणारे संदर्भ लक्षात येत नाहीत. विभक्त परिवारांमध्ये आजी आजोबा नसल्यामुळे मुलं आपल्या भाषा शिकण्या ऐवजी घरी असणार्‍या मोलकरणीची भाषा शिकतात… (माझ्या माहितीत सिंगापूरमधे बर्‍याच भारतीय घरात मुलं इंडोनेशियन भाषा बोलतात कारण मेड इंडोनेशियन !!) आणि नंतर अचानक आई वडिलांच्या लक्षात येतं की ही मुलं मराठी कार्यक्रमांना यायला टाळाटाळ करतात. त्यांना घरी आलेल्या काका काकूंचे विनोद कळत नाहीत,आजी आजोबा हे परग्रहावरून आलेले वाटू लागतात. ही मुलं मराठीमध्ये संवाद करणे टाळतात, आणि मराठीमध्ये संवाद करणार्‍यांनाही टाळतात.

आता सांगा मंडळी, की ही पिढी दुरावण्याला जबाबदार कोण? या प्रश्नाचे उत्तर इतकेही सोपे नाहीये. कारण ग्लोबलायझेशन, प्रत्येक क्षेत्रात वाढलेली स्पर्धा ह्या गोष्टी आपल्यानियंत्रणात नाहीयेत. या सगळ्यातून निर्माण झालेल्या विकासाच्या नवीन कक्षा आणि आपल्या महत्त्वाकांक्षा यांची सांगड घालणेही चुकीचे नाहीये. पण तरीही नवीन पिढी मराठी भाषेशी दुरावू नये किंवा दुरावलेल्या पिढीला मराठी भाषेशी जोडण्यासाठी प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. माझ्या काही मित्र-मैत्रिणींनी त्यांच्या घरी अजमावलेलेप्रयोग मला खूप मजेशीर वाटले… त्यातील काही उपाय / प्रयोग खाली नमूद केले आहेत.

- मराठी ही मातृभाषा असल्यामुळे ती बालपणी शिकविली गेली तरच मुलं ती शिकणार. कारण नंतर बहुतांशी शिक्षणासाठी इंग्रजी हे माध्यम असल्यामुळे मराठी शिकण्याची काही निकड नसते. (आणि शिक्षणाचे माध्यम असल्यामुळे इंग्रजी शिकण्याशिवाय पर्याय नसतो!!). त्या मुळे लहानपणी मराठी बोलणारी मुलं शाळेत जाऊ लागली की इंग्रजी आत्मसात करून उत्तम इंग्रजी बोलू शकतात. या उलट लहानपणापासून इंग्रजी बोलणर्‍या मुलांना नंतर मराठी शिकणे अवघड जाते.

- यातील काही पालक एकमेकांशी, मुलांशी तसेच मराठी मित्रमैत्रिणींशी कटाक्षाने मराठीत बोलतात. त्यांचा असा अनुभव आहे की बर्‍याच वेळी मुलं मराठीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे इंग्रजीत देतात. अशाने त्यांना मराठी कळते पण बोलता येत नाही. अशावेळी ते मुलांना मराठीत उत्तर देण्यासाठी / वाक्यरचना करण्यासाठी मदत करतात.

- बर्‍याच हौशी मंडळीच्या प्रयत्नाने मराठी बडबडगीते, बालसाहित्य आज ऑडिओ – व्हिडिओ माध्यमात उपलब्ध आहे. हे साहित्य मुलांची मराठी माध्यमातील रुचीवाढविण्यासाठी होऊ शकतो. आपण ह्या माध्यमासाठी मागणी वाढविली तर अधिकाधिक साहित्य या माध्यमांमध्ये उपलब्ध होऊ शकेल.

- एका मित्राने तर मुलांना इंग्रजीच्या बरोबरीने मराठी ऐकण्याची / वाचण्याची सवय लावली आहे. त्याची बायको इंग्रजी माध्यमातून शिकलेली असल्यामुळे तिचे मराठी यथातथाच होते. पण मुलांना शिकविण्यासाठी तिने ही मराठी वाचनाची सवय करून घेतली आहे.

- मुलांना दामटून आपल्या आवडीच्या कार्यक्रमांना न नेता त्यांच्या आवडीच्या म्हणजे बालनाट्य, नृत्य, आनंद बाजार अशा कार्यक्रमांना न्यावे. तसेच मुलांना त्यांच्या आवडी प्रमाणे मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. (आता हे ही लक्षात येईल की मुलांना अशी संधी मिळण्याकरिता कोणी तरी ते आयोजितही करायला हवेत !!)

- वाढदिवसाला केक कापण्याबरोबर औक्षण ही करावे.

- तसेच मराठी सण घरी आवर्जून साजरे करावे. शक्यतोवर घरच्या घरी सण साजरे न करता चार-चौघात मिळून सण साजरे करावे.

हे सगळे प्रयोग करीत असताना या माझ्या मित्रमैत्रिणींची बरेचदा चांगलीच भंबेरी उडाली… कारण आजकालची पिढी सांगकामी नाहीये.. अत्यंत चौकस बुद्धीने गोष्टींचे निरीक्षण करीत असते आणि कुतूहलाने बरेच प्रश्नही विचारते… त्यामुळे या प्रश्नांची योग्य उत्तरे मिळविण्यासाठी या पालकांना बराच अभ्यासही करावा लागला. बर्‍याच गोष्टी त्यांनाही नव्याने कळल्या!! हा सगळा अट्टाहास कशासाठी तर आपली भाषा आपली बोली जिवंत राहावी म्हणून… आपल्या पुढच्या पिढीने हा भाषेचा वारसा पुढे चालवावा म्हणून…

तर काय मग मंडळी पटतंय का तुम्हाला हे सगळं… हे सगळं आपल्याला पटलं आणि आपल्या रोजच्या आयुष्यात थोडेसे बदल केले तर “मराठी माझ्या घरी?” ऐवजी “मराठी माझ्या घरी !!” असे आपण अभिमानाने म्हणू शकू.

पत्ता…

“काय हो “पत्त्ता” काय तुमचा?”
माझा सध्याचा पत्ता “सुधीर”
“अहो नुसता घराचे नाव काय सांगताय… संपूर्ण पत्त्ता सांगा…”
संपूर्ण पत्ता… सुधीर मारूती निखार्गे..

“हं एखादी स्थायी खूण?… लँडमार्क?”
अहो बर्‍याच आहेत खूणा… कुठली सांगू…
मंदा आणि मारूतीचा मुलगा, रंजना आणि रेश्माचा भाऊ,
सुप्रदाचा नवरा, यांचा भाचा, त्यांचा पुतण्या, हिचा मामा, त्याचा काका…
बर्‍याच स्थायी – अस्थायी खूणा आहेत या अस्तित्वाच्या…

हा माझा सध्याचा असण्याचा पत्ता!
तसे माझ्या असण्याचे अजूनही बरेच पत्ते आहेत…
नावी – निनावी बर्‍याच जणांच्या आठवणीत ही असतो मी बहूतेक…
कदाचित हेच माझ्या नसतानाचे किंवा नसूनही असण्याचे पत्ते असतील!!

आता ह्या असण्या-नसण्याच्या गोष्टी का सुरू झाल्या…
तर काल शब्दगंधच्या मैफिलीत वीणा… (म्हणजे ती तिच्या सध्याच्या पत्त्यावर सुधीरच्या आधी पासून रहात असल्यामुळे सुधीर तिला “वीणाताई” म्हणतो)

तर तर काल शब्दगंधच्या मैफिलीत वीणा असण्या-नसण्याबद्दल खूप काही बोलली..
खूप काही बोलण्यात खूप काही सांगायचे राहून गेले…

म्हणजे अगदी रॉय किणीकरांच्या (या पत्त्यावर एक अवलिया कवी राहून गेला!!) नजरेतून पाहीले तर…
एस.टी. स्टँडवर गाडी येते… काही प्रवासी उतरतात…
काही चढतात… सहप्रवाशांबरोबर बागडतात… भांडतात… हसतात रुसतात…
मुक्कामाचे गाव आले की उतरून जातात…
उरलेले पुढे जातात… उतरून गेलेल्यांबद्दल कडू-गोड आठवणी सांगत…
उतरून गेलेले परत नवीन गाडीत चढतात…
प्रवास सुरूच राहतो….
फक्त पत्ता बदलतो…

कशासाठी….

धुक्याची मखमल दुर सारीत
गर्द राईला भेदून,
खिडकीतून घुसखोरी करताहेत
कोवळी सुर्यकिरणे…

कशासाठी?

गोठलेल्या वातावरणात
सुर्यकिरणांच्या मदतीने,
आत येऊ पहात आहे…
सुस्तावलेला गार वारा,

कशासाठी?

उशीवर चुरगळलेल्या रातराणीच्या
वासाची दुलई दुर सारून
सावध पाऊल टाकत
दबकत चालला आहे तो..

कशासाठी?

नुकत्याच नाहलेल्या
तिच्या ओलेत्या केसातुन
तिच्या खांद्यावर
ओघळलेला जलबिंदू
टिपून घेण्यासाठी….

भिती

करणारे करून गेले
होणारे होऊन गेले
आता उरल्या आहेत
सोसलेल्याच्या जखमा

ह्या जखमा भरून
निघतील ही कदाचित
पण मागे राहतील
त्या जखमांचे व्रण

पण खरचं हे सगळं
इतकं सोप्प आहे का?

ते चालताहेत कारण
त्यांना नाहीये वेळ
त्यांच्या जखमा
कुरवाळत बसायला

पण आत खोलवर कुठेतरी
ठुसठुसत आहेत
त्यांच्या जखमा…

ह्या वेदने बरोबरच आहे भिती
पुन्हा कोणीतरी येण्याची
काहीतरी करून जाण्याची
आणि पुन्हा सोसायला लागण्याची….

(ही कविता माझी पत्नी सौ. सुप्रदाने आतंकवादी हल्ल्यांनंतर जनमानसात असलेल्या भितीबद्दल व्यक्त केलेल्या भावनांवर आधारित आहे.)

भय इथले संपत नाही

अरे भय इथले संपत नाही म्हणून
रडत रहाणार आहेस का जन्मभर?

किती दिवस… अरे किती दिवस
आहार, निद्रा, भय, मैथुनाच्या चौकोनात
पशुवत आयुष्य कंठणार आहेस
की तमसो मा जोतिर्गमय म्हणत
माणूस म्हणून जगणार आहेस?

किती दिवस… अरे किती दिवस
असा पळणार आहेस
स्वत:च्या सावली पासून
तुझी सावली पडते कारण…
तु अवलंबून आहेस दुसर्‍याच्या प्रकाशावर

कर तुझी आंत‍रज्योत प्रदिप्त
आणि मग बघ तुच तुझा सुर्य होशील

समर्पण

तो आणि ती
रेल्वेच्या रूळासारखे
मैलोंन मैल एकत्र चालूनही
कधीही न भेटणारे… …समांतर

तो आणि ती
धरती आणि आकाशासारखे
क्षितिजावर भेटूनही
कधीच न भेटणारे… … आभास

तो आणि ती
केंद्र आणि परिघासारखे
एकमेकांच्या कक्षेत फिरणारे
कधीच जवळ न येणारे… … मर्यादा

तो आणि ती
दिवाळीच्या दिव्यासारखे
पाणी आणि तेल एकत्र राहूनही
कधीच न मिसळ्णारे… … अलिप्तता

तो आणि ती
कृष्ण आणि राधेसारखे
एकमेकांचे असूनही
कधीच एकमेकांचे नसणारे… … समर्पण